TOD Marathi

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. भाजपकडे स्पष्ट संख्याबळ नसतानाही त्यांच्या बाजूने पाचवा उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं आणि निवडणुकीत चुरस वाढली. भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी 21 मतांची गरज आहे, तर महाविकास आघाडीच्या सहाव्या उमेदवाराला 9 ते 10 मतांची गरज आहे. यातच भाजपने पहिला डाव टाकल्याने महाविकास आघाडीतील एक मत उघड उघड फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. (Vidhan Parishad Election 2022)

महाविकास आघाडीच्या गोटातील अपक्ष आमदार विनोद अग्रवाल (Vinod Agrawal) यांनी पुन्हा एकदा उडी मारल्याचं समोर आलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. हॉटेल ताजमध्ये झालेल्या या बैठकीत पक्षातर्फे स्ट्रॅटजी करण्यात आली. या बैठकीत कशा पद्धतीने मतदान करायचं, याची रणनीती देखील ठरवण्यात आली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बैठकीला काही अपक्षांनी उपस्थिती लावली. विनोद अग्रवाल देखील या बैठकीला उपस्थित होते.

राज्यसभेच्या निवडणुकीवेळी अग्रवाल यांनी ठाकरे सरकारला पाठिंबा दिला होता. सात जूनला मविआतर्फे करण्यात आलेल्या शक्तीप्रदर्शनाला त्यांनी उपस्थिती लावली होती. पण आता अग्रवाल यांना स्वत:च्या गोटात घेण्यात फडवीसांना यश आल्याचं दिसतंय. कारण १२ दिवसात अग्रवाल यांनी मविआची साथ सोडून भाजपचा हात धरलाय. त्यामुळे मतदानाआधीच भाजपकडे आणखी एक मत वाढल्याचं स्पष्ट झालंय.

अग्रवाल गोंदियातून निवडणुकीला उभे होते. याआधी त्यांचे भाजपसोबत निकटचे संबंध होते. पक्षाने तिकीट नाकारल्याने त्य़ांनी अपक्ष निवडणूक लाढवली आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष निवडून आले. राज्यसभेच्या जागेसाठी त्यांचं प्रफुल्ल पटेल यांच्याशीही बोलणं झाल्याचं समोर आलं होतं. मात्र आता ते पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत.